सर्वेक्षण गुरुजींनाच करावं लागणार.
पुणे (प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्य पुण्याचे शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियाना बाबतचे स्पष्टीकरण देताना एक परिपत्रक असे काढले आहे त्या परिपत्रकात पुढे नमूद केलेल्या या बाबी आहेत.
उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय क्र.१ अन्वये, नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीमध्ये राबविण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. संदर्भ क्र. २ अन्वये राज्य अभियान प्राधिकरणाच्या इतिवृत्तातील सुचनांनुसार सदर योजनेची प्रभावी अमलबजावणी करणेबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. सदर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीकरिता या कार्यालयास्तरावरून दि. ४ /०७/२०२३ रोजीच्या पत्रान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. तसेच ऑफलाईन सर्वेक्षणाबाबत या कार्यालयास्तरावरून दि. १९/०८/२०२३ रोजीच्या पत्रान्वये सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
जनगणना २०११ मधील उपलब्ध माहितीनुसार या कार्यालयास गावनिहाय निरक्षरांची आकडेवारी प्राप्त झालेली आहे परंतु गावनिहाय निरक्षरांचे नावे अप्राप्त आहे. त्यामुळे अशा निरक्षरांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार राज्यातील १५ वर्ष व त्यावरील वयोगटातील निरक्षरांची संख्या साधारणपणे १ कोटी ६३ लक्ष इतकी आहेत. सदर निरक्षर व्यक्तीना मार्च सन २०२७ अखेरपर्यंत साक्षर करण्यासाठी समाजातील विविध घटकांचा स्वयंसेवी पध्दतीने अध्ययन-अध्यापनासाठी सहभाग घेण्यात येत आहे. त्यापूर्वी संदर्भीय पत्र क्र.४ अन्वये, या योजनेकरिता ऑफलाईन पध्दतीने सर्वेक्षण करून निरक्षरांची माहिती शिक्षक (सर्वेक्षक) यांनी प्रपत्र १,२,३ मध्ये भरून शाळा मुख्याध्यापकांकडे द्यावयाची आहे. ऑफलाईन सर्वेक्षणाबाबत विविध संघटनांच्या प्राप्त निवेदनांनुसार संचालनालय स्तरावरून सहकार्य करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यात कुठेही सदरचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थाकडून करण्यात येईल असे म्हटलेले नाही.
नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या सर्वेक्षणाबाबत महाराष्ट्रातील विविध वृत्तपत्रांमध्ये सदरचे सर्वेक्षण स्वयंसेवी संस्थामार्फत करण्यात येणार असल्याच्या चूकीच्या बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, असे कोणत्याही प्रकारचे आदेश या कार्यालयस्तरावरून निर्गमित झालेले नाहीत. नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण हे सद्यस्थितीत सुरू असलेल्या शाळाबाहय विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासोबतच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांकडून करावयाचे आहे, याची नोंद घ्यावी, हे सर्वेक्षण शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत शिक्षकांनी करावयाचे आहे ही बाब कटाक्षाने पाळली जाईल याकडे लक्ष द्यावे. कोणत्याही स्थितीत शाळेच्या वेळेत सर्वेक्षण करावयाचे नाही तशा सूचना सर्व संबंधिताना आपल्यास्तरावरून तात्काळ देण्यात याव्यात. तसेच संदर्भ क्र. ४ मधील दि. १९/०८/२०२३ रोजीच्या पत्रानुसार ऑफलाईन सर्वेक्षणाची कार्यवाही विहित मुदतीत होईल याची दक्षता घ्यावी. सदर बाबीस आपल्या स्तरावरून आवश्यकतेनुसार स्थानिक वृत्तपत्रे व आकाशवाणीवरून मोफत प्रसिध्दी द्यावी.(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय (योजना) महाराष्ट्र राज्य पुणे

