वेदना देणार्या वर्षाचा,
आजचा शेवटचा दिवस...
मुबंई ( प्रतिनिधी)
वेदना देणार्या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. गेल्या शंभर वर्षातील वेदनादायी ठरलेले हे 2020 वर्ष. या वर्षाला आपण सर्वांनी ज्या धैर्याने तोंड दिले, त्याबद्दल आपले अभिनंदन.
मानवी इतिहासात एका संसर्गजन्य आजाराने संपूर्ण जगाला विळखा घातला. आजाराचे स्वरूपही इतके भयानक की मानवाने मानवाशी संपर्क तोडावा. मृत्यूची अवहेलना इतकी की मृतदेहाला कुणी स्पर्श करू नये. अंत्यदर्शन, द्वारदर्शन तर दूरच, परंतू सहवेदना सुध्दा देवू शकलो नाहीत असे हे वर्ष. या वर्षात अनेक नवीन शब्दांची भर आमच्या दैनंदिन शब्दांमध्ये पडली. सोशल डिस्टन्स, सॅनेटायझेशन, मास्क, आयसोलेशन, कन्टेन्टमेन्ट झोन, क्वारंन्टाईन, कोरोना, कोविड, पल्स, ऑक्झीमिटर, पॅन्डेमिक, इम्युनिटी, कम्युनिटी स्प्रेड, ऑनलाईन या सारख्या अनेक शब्दांचा वापर दैनंदिन संभाषणात वाढला. माणसाने नेहमी ‘पॉझिटीव्ह’ असावे हा शब्द वेदनादायी ठरला. ‘पॉझिटीव्ह’ची जागा ‘निगेटिव्ह’ने घेतली. बाहेर फिरावे, शतपावली करावी, फिजिकल फिटनेस ठेवावा, जीममध्ये जावे, मॉर्निगवॉक करावे, या शब्दांऐवजी घरातच थांबा, बाहेर पडू नका, कुणाशीही बोलू नका, हस्तांदोलन करू नका हे शब्द रूढ झाले. रविवारी देखील घरात न थांबणारी मंडळी तब्बल सात महिने घरात भांडी घासू लागली. काहींनी घरातच राहून वेगवेगळे छंद जोपासले, तर थोड्यांनी लेखन करून साहित्याची निर्मिती केली. सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर या काळात झाला. संदेशांची प्रचंड मोठी देवाण घेवाण करत असतांना बायकांवर विनोदी किस्से गाजले. वेगवेगळ्या व्हिडीओच्या माध्यमातून नविन माहिती मिळाली. परंतू याच काळात हजारोंच्या संख्येने तरूणांच्या नोकर्या गेल्या. लाखो लोक बेरोजगार झालीत. दुकाने बंद पडलीत. लॉकडाऊनमुळे सर्वच बंद असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार थांबले. प्रवास थांबले, रहदारी थांबली. वाहनांनी तब्बल आठ महिने विश्रांती घेतली. घराघरात काढे उकळू लागले, हळदी लिंबूचे गरम पाणी पीवू लागले, वाफ घेवू लागले. मला कोरोना तर झाला नाही ना ? अशी शंका प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर करून गेली. साधी शिंक आली, खोकला आला तरी घरातलीच मंडळी शंका घेवू लागली. संशयकल्लोळ घराघरात-मनामनात घर करून गेला. सरकारी यंत्रणा काम करत असतांना जनता घरात थांबली. चोवीस तास चालणार्या वृत्त वाहिन्यांवर केवळ आणि केवळ कोविड-19 रूग्णसंख्येच्या बातम्या येत राहिल्या. आणि त्यानंतर 80 च्या दशकातील रामायण-महाभारत, श्रीकृष्ण या सारख्या टीव्ही मालिकांनी जनतेला दिलासा देण्याचे काम केले. परंतू महाभारत मालिकेतील कालचक्राप्रमाणे कोविडचा आठ महिन्याचा अतिशय कठिण आणि जीवघेण्या कालखंडाची तिव्रता कमी होत गेली. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. हळू हळू जनजीवन रूळावर येवू लागले. तोच नव्या कोरोनावताराची चर्चा सुरू झाली आहे. परंतू नागरिकांनी आता कोविड - 19 मुळे संयमी आणि आरोग्याची काळजी घेवून जगण्याची कला अवगत केली आहे. अद्यापही या संसर्गजन्य महामारिचे गांभिर्य कळाले नाही अशा नागरिकांची संख्या अत्यल्प आहे. परंतू या महामारीने आम्ही अध्ययनाच्या आणि अध्यापनाच्या नव्या पद्धती आत्मसात केल्या.
आरोग्याची काळजी घेण्याचे तंत्र अवगत केले. वारंवार हात धुणे, कुठेही न थुंकणे, खोकतांना रूमाल तोंडावर धरणे, प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारावर लक्ष्य ठेवणे अशा बाबींकडे लक्ष देऊ लागलो. गरज असेल तरूच बाहेर पडायचे, एकाच फेरीत सर्व कामे आटोपायची हे शिकलो. आपण स्वतःही अनेक कामे करू शकतो त्यामुळे पूर्णतः परावलंबी न राहण्याच्या अनेक चांगल्या गोष्टीही आम्ही या काळात शिकलो. वाचनाची आणि लेखनाची सवय देखील अनेकांनी या काळात आत्मसात केली. आणि विशेष म्हणजे एखादी वस्तू नसतांना पर्यायी वस्तूंचा वापर करणे आम्ही शिकलो. मुलांच्या असलेल्या अनावश्यक सवयी थांबल्या. परिवारिक संवाद वाढले. परंतू आर्थिक परिस्थितीमुळे काही कुटूंबामध्ये पारिवारिक विवाद देखील झाले. आर्थिक विवंचनेतून मार्ग काढण्याचे कौशल्य आम्ही आत्मसात केले. 20 लोकांमध्ये ‘अंतयात्रा’ आणि 50 वर्हाड्यांसमवेत ‘लग्न’ या नविन संकल्पना रूजल्या. आजाराचे वैश्विक स्वरूप शास्त्रज्ञ, संशोधक, आरोग्य क्षेत्रातील वैज्ञानिकांनी अनुभवले. एक विषाणू वेगळ्या स्वरूपात पून्हा प्रकट होवू शकतो. त्याची लक्षणे वेगळी असू शकतात. हा अनुभव वैद्यकीय क्षेत्राला आला. आणि ताबडतोबीने एखादा विषाणू जगभर पसरून जगाला विळखा घालू शकतो यावर वैद्यकीय क्षेत्रासह सत्ताधारी मंडळी चिंतन करू लागली. भविष्यााठी आरोग्याच्या योजना आखू लागली. त्यामुळे 2020 ला घाणेरडे, दुखदायी वर्ष म्हणण्यापेक्षा अनुभव देणारे वर्ष म्हणूया. या वर्षाने समस्त मानव जातीला वेदना दिल्या आहेत. परंतू त्यातून आम्ही खूप काही शिकलो. जीवनात आपल्या अवती भोवती वेदना देणारी अनेक माणसे असतात. काही आप्तेष्ट असतात. काही रक्ताच्या नात्यातील असतात तर काही मित्र परिवारातील देखील असतात. परंतू 2020 हे वर्षच वेदना देणारे ठरले. परंतू त्यातून मानवीमूल्य, प्रेम, सहकार्याची भावना आमच्या ह्दयात वाढीस लागली ही समाधानाची बाब समजावी. सरत्या वर्षातल्या वेदना खुप काही शिकवून गेल्यात. या वर्षात आम्ही ‘पॉझिटीव्ह’ या शब्दाला खुप घाबरलो, परंतू येणार्या भविष्यात विचारांनी पॉझिटीव्ह रहायलाच शिका. या वेदनादायी वर्षाचा आजचा शेवटचा दिवस, त्याला अलविदा करूया. पून्हा अशा प्रकारचे वेदनादायी वर्ष या पृथ्वीतलावर येवू नये, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करू या. एवढेच.