"मराठी राजभाषा दिन विशेष लेख"
•पुणे (प्रतिनिधी)_____
★(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)★
"२७ फेब्रुवारी" हा दिवस 'मराठी साहित्याचा मानदंड' वि.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो.
या मराठी भाषा दिवसामुळे प्रकर्षाने जाणवतं ,की किती सुंदर आणि समृद्ध परंपरा आहे आपली मराठीची.महाराष्ट्रातील आचार विचारांच्या परंपरांनी मराठी संस्कृतीची जडणघडण केली.आणि आमची मराठी भाषा आमची मायबोली झाली.आमची मातृभाषा झाली.
मराठीच्या प्रत्येक उच्चारामधून रोमारोमात आपुलकी जाणवत राहते.जिव्हाळा,प्रेम ओसंडून वाहत असतो.कारण मायबोली आपल्या रक्तात ,तनामनात असते;ज्यामुळे आपल्या संस्कारांचे पालनपोषण होते,आणि भाषेद्वारेच आपल्या अस्तित्वाची खरी ओळख पटत राहते.
◆मराठी भाषेविषयी आपोआपच काही ओळी ओठावर येतात
" थोर मराठी रे भाषा
जसा अमृताचा प्याला
रसास्वाद आहे भरुनी
गोड वाटतो मनाला"
माय जशी मुलांसाठी प्रेमळ, स्नेहमयी,वात्सल्याने ओतप्रोत भरलेली मूर्ती असते,तशीच माझी मायमराठी मला वाटते.प्रत्येक बारा मैलावर भाषा बदलते म्हणतात,तसेच आपल्या मायमराठी चे आहे. मराठीलाही कित्येक,बोलीभाषाआहेत.जसेकी,अहिराणी,वऱ्हाडी,मा-लवणी,कोकणी,घाटावरची भाषा इत्यादी....पण प्रत्येक बोलीभाषेत कमालीचा गोडवा जाणवतो,आणि तितकीच ती कर्णमधुर वाटत राहते.
मनाच्या आतल्या गाभाऱ्यातून प्रकट होणारी भाषा तिच्या अंगभूत गुणांमुळे मराठी मनाशी जवळीकता साधते,आणि ऐकणाऱ्याला मंत्रमुग्ध करत राहते.
मराठी भाषेच्या कौतुकप्रसंगी "सुरेश भटांच्या" काही ओळी लगेच डोळ्यासमोर तरळून जातात-
"लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ,जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय एक मानतो मराठी"
खरेच,मराठी भाषेची थोरवी,महती वर्णावी तितकी कमीच आहे.मराठी भाषा ,आणि बोलीभाषेतील सामर्थ्यस्थळे यांचा विचार केला तर मनपटलावर उभे राहतात ते संत तुकोबांची वाणी,संत ज्ञानेश्वरांचे अभंग ,संत एकनाथांची भारुडे,छत्रपती शिवरायांची तलवार,मावळ्यांची निस्सीम निष्ठा या आणि अशा कित्येक साऱ्या घटना. अशा अनेक मराठीच्या साहित्य प्रकारातून आपण या घटनांना अगदी जवळून वाचनातून अनुभवलंय.
"माझी मराठी ही माय,
जशी दुधावरली साय"
असा आपलेपणा मराठीविषयी वाटत राहतो.अलीकडे खूप लहान वयातच इंग्रजी शिकण्याचा अट्टाहास केला जातो,परिणामी मुलांच्या मनात अवघड संकल्पना, संबोध तसेच राहतात, आणि पुढे जाऊन त्याचा व्यवहारात वापर करताना त्या गोष्टी क्लिष्ट वाटत राहतात. याउलट,मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेतल्याने अवघड संकल्पना समजतातच, आणि मनातल्या भावभावनांचे प्रकटीकरण अधिक आत्मविश्वास पूर्वक होऊ लागतं. त्यामुळं सर्वांनी आपल्या मायबोली मराठीचा अभिमान बाळगला पाहिजेच आणि शिक्षण ही मातृभाषेतूनच घेतलं पाहिजे.
"अभिमान असे मराठीचा आम्हा
तिच्यापुढे सर्व फिके वाटे
कोहिनुर हिऱ्यासम तेजस्वी ती
तिचा मधाळ गोडवा मुखी साठे"
■■■■■■■■■■■■■■
(सौ. छाया संदीप,जावळे.
वाई, सातारा
सदस्या, मराठीचे शिलेदार समूह
मो. नं.9765392882
®®®®®®®®®®®◆◆◆◆◆●●●
