कोथरूड (पुणे) येथे सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करत विवाह सोहळा संपन्न ; उद्योजक शिरीष तांगडे वआदर्श सरपंच श्रीराम वायकर यांचा विशेष पुढाकार

Maharashtra varta
(तांगडे  व वायकर परिवाराचे लग्न  सोहळ्यासाठी येणारा खर्च त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 51 हजार रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  51 हजार रुपये असे एकूण 1 लाख  2 हजार रुपये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडे चेक स्वरूपात सुपूर्त करताना)
__________________________________________

कापूरहोळ (प्रतिनिधी):-- विठ्ठल पवार.

(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)

मे महिना म्हणजे लग्नसराईची सर्वत्र धामधूम... सनई, चौघड्यांचा नादमधुर आवाज... फटाक्याची आतिषबाजी... शाही मंडपाचा साज... हजारोंच्या संख्येने पै-पाहुण्यांची उपस्थिती... वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद घेण्यासाठी वाकून वाकून नवरानवरी हैराण... पंगतीसाठी उडणारी झुंबड... लाखो रुपयांचा होणारा चुराडा... जावयांचे रुसवे-फुगवे... या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण अनुभवत होतो. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगात हाहाकार माजवलेला असताना या सगळ्या गोष्टी कालबाह्य झाल्या की काय?  असा भास गुरुवारी (दि.१४) कोथरूड येथील रहिवासी असणारे व हर्षल फिड्स कंपनी कापूरहोळ ता. भोरचे संस्थापक अध्यक्ष शिरीष तांगडे  यांच्या राहत्या घरी कोथरूड येथे अनुभवण्यास मिळाला.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन च्या काळात चि.प्रसाद श्रीराम वायकर व चि. सौ.कां. लोचना शिरीष तांगडे  यांचा विवाह समारंभ अतिशय साधेपणाने कोथरूड येथील राहत्या घरी संपन्न झाला. विवाह सोहळ्यासाठी येणारा खर्च त्यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 51 हजार रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  51 हजार रुपये असे 1 लाख  2 हजार रुपये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील व नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्याकडे चेक स्वरूपात सुपूर्त करण्यात आला. व तांगडे वधू परिवाराने वर परिवार  वायकर यांना 5 लाख रुपये वधू कन्येच्या  नावाने  एफ .डी. करून  सप्रेम भेट दिले.


दोन्ही परिवाराने विवाह घरीच शासन नियमांचे तंतोतंत पालन करीत पार पाडला. व सामाजिक बांधिलकी जपत दोन्ही परिवारांना समाजात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

 गुरूवारी कोथरूड मध्ये  तांगडे यांच्या राहत्या घरी संपन्न झालेले लग्न पाहता एक विवाह ऐसा भी ! अशीच म्हणायची वेळ आली आहे.


      कोथरूडचे व कापूरहोळ ता. भोर  येथील हर्षल फिडसचे उद्योजक शिरीष तांगडे  यांची कन्या लोचना व मुळशी तालुक्यातील भांबार्डे चे  आदर्श सरपंच श्रीराम वायकर यांचे  चिरंजीव ऍडवोकेट प्रसाद यांचा शुभविवाह संपन्न झाला. 

समाजातील प्रतिष्ठित असलेल्या  कुटुंबाचे  लग्न शाही पद्धतीने असले  तरी चार ते पाच हजार  माणसे  सहज जमतात. परंतु या लग्नाला मात्र मुलीकडील चारजण, मुलाकडील चारजण, भटजी   व लग्नाचे संयोजन करणारे दोन्हीकडील एक-एक व्यक्ती,  16 मान्यवर या लग्नास  उपस्थिती होते.  या लग्नात मात्र डोक्यावर शाही मंडप तर सोडाच कसलाही कापडी पडदा न लावता भर दुपारी १ च्या सुमारास सुर्यनारायणाच्या साक्षीने मान्यवरांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी आखलेल्या रिंगणात उभे राहून कुठलाही डामडौल न करता अत्यंत साधेपणाने लग्न लावून पुणे शहरात व पुणे जिल्ह्यात एक नवा आदर्श घालून दिला आहे.
     
 या आगळ्यावेगळ्या विवाहासाठी वधूचे पिता उद्योजक असलेले  शिरीष तांगडे व वरांचे पिता व भांबर्डे चे  आदर्श सरपंच श्रीराम वायकर  यांनी  विशेष पुढाकार  घेतला.


यावेळी सोशल डिस्टंसिंगसाठी जमिनीवर पांढऱ्या गोलांची आखणी करून त्या ठिकाणी सॕनिटायझरची फवारणी करीत प्रत्येकाला मास्क परिधान करण्यास बंधनकारक करून संचारबंदीतील सर्व नियमांचे काटेकोर पालन करीत विवाह सोहळा पार पाडला.

       विशेष म्हणजे लग्न सोहळा पार पडल्यावर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेताना देखील चरणस्पर्श टाळून ठराविक अंतर ठेवूनच आशीर्वाद घेतले. या आगळ्यावेगळ्या लग्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून लॉकडाऊन नंतरही ही प्रथा कायम राहिल्यास अनेक मुलीचे बाप कर्जबाजारी होण्यापासून निश्चितच वाचतील यात शंका नाही.

   
   (यावेळी बोलताना वधुपिता उद्योजक शिरीष तांगडे  म्हणाले, चार महिन्यांपूर्वीच वधुवरांच्या लग्नाची तारीख ठरलेली होती. लग्न १४ मे रोजी निश्चित झालेली असताना लॉकडाऊनमुळे ते करणे शक्य झाले नव्हते. सर्व कायदेशीर बाबी तपासून सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे ठरवून १४ मे ही तारीख निश्चित केली. दोन्ही गावातील ग्रामस्थ व दोन्हीकडील पाहुण्यांनी सहकार्य करीत कोणत्याही नियमाचे उल्लंघन न करता  हा विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने विधिवत पार पाडला याचा आनंद होत आहे.)
To Top